भरदिवसा गँगवॉर तरुणावर गोळीबार शहरात भीतीचे वातावरण गोळीबारामागचे सत्य?
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा टोळी युद्धाचा (गँगवॉर) भडका उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आज दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास शहरातील वर्दळीच्या ‘डावखर रोड’वर अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर थेट गोळीबार केला.या भीषण गोळीबारात ‘कल्लू यादव’ नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून,या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात भीतीचे आणि प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका जुन्या वादातून हा खुनी हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे. जखमी कल्लू यादव याला तातडीने स्थानिक ‘साखर कामगार हॉस्पिटल’ येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.गोळीबारात जखमी झालेला कल्लू यादव हा नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या एका प्रमुख उमेदवाराचा पुतण्या असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि शहरात रंगली आहे.
त्यामुळे या हल्ल्यामागे केवळ टोळी युद्ध आहे की राजकीय वैमनस्य, याचाही शोध आता घेतला जात आहे.भरदिवसा मुख्य रस्त्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी मोठा फौजफाटा रवाना केला.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.हल्लेखोर कोण होते? त्यांनी किती राऊंड फायर केले? याचा सविस्तर तपास सध्या पोलिसांमार्फत युद्धपातळीवर केला जात आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.
