फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा लढाऊ आधारवड हरपला;कामरगावचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामदास सातपुते काळाच्या पडद्याआड ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास;परिसरात शोकाकुल वातावरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील कामरगाव येथील सामाजिक आणि वैचारिक चळवळीतील एक निष्ठावान व्यक्तिमत्व, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक रामदास मन्सीराम सातपुते (वय ८६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनामुळे कामरगाव परिसरासह नगर तालुक्यातील सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.कालकथीत रामदास सातपुते यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची कास धरली होती. एक अभ्यासू,स्वाभिमानी आणि लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. केवळ विचारांचे समर्थन न करता,त्यांनी आपल्या आचरणातून सामाजिक समतेचा संदेश दिला.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण पिढ्यांनी वैचारिक बैठक तयार केली होती.सुसंस्कृत कुटुंबाचा आधार रामदास सातपुते यांनी केवळ सामाजिक कार्यच केले नाही,तर आपल्या कुटुंबालाही उच्च संस्कारांची शिदोरी दिली. त्यांच्या पश्चात पाच मुले,सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची मुले – माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब सातपुते,पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब सातपुते आणि शिक्षक भागचंद सातपुते यांनी समाजात आपापल्या क्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे.तसेच,त्यांची नातवंडे – सहाय्यक सहकार अधिकारी प्रज्ञा सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल विकास सातपुते, इंजिनिअर संकेत सातपुते आणि ऋषिकेश सातपुते हे उच्चशिक्षित असून,सातपुते कुटुंबीयांनी सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारीचे उत्तम भान जपले आहे.
एका संस्कारक्षम पिढीचा पाया रचण्यात रामदास सातपुते यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा एक आधारस्तंभ निखळला आहे.कालकथीत रामदास सातपुते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी जलदान विधी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.जलदान विधी सोमवार,दि.२० जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कामरगाव येथे संपन्न होणार आहे,अशी माहिती सातपुते कुटुंबीयांनी दिली आहे.
