
अहमदनगर (दि.१५ जानेवारी):-‘कोतवाली पोलिसांचे समाजपयोगी कारनामे ऐकूण तुम्हालाही खरोखरच सुखद धक्का बसेल.आजच्या जमान्यात कुणी कुणावर सहजपणे विश्वास ठेवायला तयार नाही,पण कोतवालीच्या पोलीस दादांनी मना~ध्यानातून गेलेले, हवेहवेसे वाटणारे मौल्यवान दागिने तब्बल दोन दशके उलटून गेल्यानंतरही पुन्हा मूळ मालकांना देत सर्वसामान्यांच्या मनात ‘विश्वास’ निर्माण केला आहे.
संक्रातीच्या मुहूर्तावर महिला साज-शृंगार करतात पण हा शृंगार दागिण्यांशिवाय गौणच! अनेक वर्षांपूर्वी चोरीला गेलेले सोने संक्रातीच्या मुहूर्तावर सकाळीच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ताब्यात दिल्याने तक्रारदार व त्यांच्या वारसांनी संक्रांतीचा मधुर गोडवा अनुभवला.
ज्ञानेश्वर लगडे (रा.सौरभ कॉलनी अहमदनगर) यांच्या घरी सन २००३ साली घरफोडी झाली होती.या घरफोडीत चोरी गेलेल्या ५ सोन्याच्या बांगड्या तब्बल २१ वर्षानंतर त्यांना परत देण्यात आल्या आहेत,त्यानंतर मयत सुमनबाई क्षीरसागर (रा.ब्राह्मणगल्ली केडगांव अहमदनगर) या दर्शनासाठी गेल्या असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळयातील सोन्याची चैन लंपास केली होती.याबाबत २०१० साली गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आरोपीकडून जप्त केलेले सोने तब्बल १३ वर्षानंतर त्यांचा मुलगा सतीश क्षीरसागर यांच्याकडे १५ ग्राम सोन्याची लगड परत करण्यात आली,त्यानंतर मंदाबाई दुग्गड (रा.आगरकर मळा, अहमदनगर) यांच्या गळयातील सोन्याची चैन सन २०११ साली चोरी गेली होती.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती.सुमारे १२ वर्षानंतर त्याची चोरीस गेलेली ६ ग्राम वजनाची सोन्याची चैन त्यांना परत करण्यात आली, त्यानंतर आनंद नांदुरकर (रा.रामचंद्र खुंट, अहमदनगर) यांच्या लहान मुलाच्या कानातील सोन्याच्या बाळया सन २०१५ साली चोरी गेल्या होत्या. सुमारे ८ वर्षानंतर चोरी गेलेल्या २ ग्राम वजनाच्या कानातील बाळया त्यांना परत करण्यात आल्या आहेत. इतक्या जुन्या चोरीतील ऐवज पुन्हा मिळाल्याने काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. भरल्या नयनांनी सर्व तक्रारदारांनी व त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पो.हे.कॉ.तनवीर शेख, पो.हे.कॉ.दिपक साबळे व महीला पो.शि. जयश्री सुद्रीक आदींनी केली आहे
कोतवाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव
‘अनेक दिवसांपासून हा विषय प्रलंबित होता. मा.न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधितांना दागिने परत करण्यात आले. संक्रातीच्या मुहूर्तावर दागिने परत करता आले याचे निश्चितच समाधान वाटते.