
संगमनेर (नितीन भालेराव):-संगमनेर तालुका भाजपमध्ये संघटनात्मक धुसफूस उफाळून आली आहे,तालुका कार्यकारिणी नुकतीच तीन महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली जाहिर करण्यात आली होती. तालुक्यातील सर्वसमावेशक सामाजिक समरसता असलेली कार्यकारिणीचे सर्वच पक्षश्रेष्ठींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या.मात्र दोन महिन्यातच काही नव्या व जुन्या कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झालं, कर्मचारी व कार्यकर्ता असा रोष घुसमटू लागला त्याच राज्याच्या नेत्यांपर्यंत या घटनेचं लोण पोहचलं आणि सुंसघटीत पक्ष संघटनेला दृष्ट लागली.
जिल्ह्याचे तथा राज्याचे महत्वाचे मानले जाणारे नेते यांनीही “कान भरो” कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हेवेदावे समोर आणत बुथ पातळीवरील एका कार्यकर्त्याला राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला,दबाव टाकूनही राजीनामा देत नाही म्हणून चक्क तालुकाध्यक्ष ना संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यासाठी दबाव टाकण्यात आला मात्र प्रदेश कार्यालयातुन या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे यामुळे तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला तर नव्या कार्यकर्त्यांनी थेट महत्वाच्या पदावर असलेल्या नेत्याला मान खाली घालायला लावली आहे.
भाजप पक्ष संघटन समजून घेण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांनी अनेक केडर शिबिराचां लाभ घेतला आहे, मात्र नव्यानेच पक्षात आलेल्या नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना व्यक्तिनिष्ठ राजकारणांचे धडे शिकवले जातात, यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ कार्यकर्त्यांची संख्या अधिक वाढत चालली खरी पंरतु ही पद्धत येणाऱ्या लोकसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा नेत्यांना मान खाली घालवायला लावेल असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.