अहिल्यानगर (प्रतिनिधी):- पोलीस व महसूल प्रशासनाचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारची नोटीस न देता नागरीकांच्या मालमत्ता जमीनदोस्त करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे सांगत नगर जिल्हयाचा बिहार झाल्याचा गंभीर आरोप करीत खासदार नीलेश लंके यांनी संताप व्यक्त केला.
खा.नीलेश लंके यांनी शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेउन राजकीय आकसातून अशी कारवाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.वडगांव गुप्ता येथे आदिवासी भिल्ल समाजाचे कुटूंब ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे.कायद्याचा दुरउपयोग करून या आदीवासी बांधवांच्या झोपडया जमीनदोस्त करण्यात आल्या लंके यांनी सांगितले.नगर शहरातही महापालिका आयुक्तांकडून चुकीच्या कारवाया करण्यात येत आहेत.लोकांकडे उतारे असतानाही त्यांचे म्हणणे एकूण न घेता गाळे जमीनदोस्त करण्यात आले.
ज्या अधिकाऱ्यांनी या कारवाया केल्या आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खा. लंके यांनी केली.महानगरपालिकेतील कारनामे बाहेर काढले तर आयुक्तांना पळता भुई थोडी होईल.महापालिका व महसूल प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने कारवाई करू नये.अधिका-यांना फोन केल्यावर ते आमच्यावर दबाव असल्याचे सांगतात. अधिकाऱ्यांवर दबाव आहे म्हणून तुम्ही लोकांना उध्वस्त करणार का ? असा सवाल लंके यांनी केला.