मोहरमच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४३२ जण तडीपार पोलिसांच्या ‘त्या’ लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे? शहरात छावणीचे स्वरूप:ड्रोन कॅमेरे,कोम्बिंग ऑपरेशन आणि तगडा बंदोबस्त शांतता भंग केल्यास आता खैर नाही..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आगामी मोहरम-२०२६ सण अत्यंत शांततेत,उत्साहात आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी अहिल्यानगर पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे.शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,यासाठी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्में यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शहरात अत्यंत कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत अहिल्यानगर शहर उपविभागातील तब्बल ४३२ संशयित व उपद्रवी लोकांवर तडीपारीची आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलीस प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार,मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी एकूण ४७४ जणांवर चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (बाँड) लिहून घेण्यात आले आहे.यामध्ये दारूविक्री करणाऱ्या व बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असलेल्या १३ जणांचा समावेश आहे.
तसेच,शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ६ अट्टल गुन्हेगारांना ६ महिन्यांकरिता थेट जिल्ह्यातून तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे.याशिवाय,मोहरम मिरवणूक कालावधीत शांततेला बाधा पोहोचवू शकणाऱ्या ४३२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. समाजात धार्मिक सलोखा कायम राहावा यासाठी पोलीस प्रशासनाने ५३ शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी,जातीय सलोखा आणि धर्मगुरूंच्या बैठका घेऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.
मिरवणूक कालावधीत उपद्रव करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई.
६ अट्टल गुन्हेगार हद्दपार: ६ महिन्यांसाठी जिल्ह्यातून केले तडीपार.
ड्रोन आणि सीसीटीव्ही वॉच: शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर आधुनिक कॅमेऱ्यांची करडी नजर.
तगडा फौजफाटा: २ अपर पोलीस अधीक्षक, ५ एसडीपीओ, २१ पोलीस निरीक्षक आणि तब्बल ८५० पोलीस अंमलदार तैनात.
शहरातील संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल भागांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण शहरात ‘कत्तल की रात’ आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर, तसेच मिश्र लोकवस्तीच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की,सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष मैदानावर कोणीही अफवा पसरवण्याचा,जातीय सलोखा बिघडवण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास,त्याच्याविरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.तडीपारची ही धडक आणि कौतुकास्पद कारवाई शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टीपरसे,कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य,भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या स.पो.नि.तेजश्री थोरात यांच्यासह कोतवाली,तोफखाना आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
