अहिल्यानगरमध्ये राजकीय भूकंप! विधानपरिषद निवडणुकीत अर्जावर खोटी सही करून माघार घेतल्याचा अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंचा खळबळजनक आरोप..माझी फसवणूक झाली..न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करणार..पानसरे.. !
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर अहिल्यानगर विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कमालीचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्याची तयारी सुरू असतानाच,अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत आपल्या नावाचा माघारीचा अर्ज खोटा असल्याचा गंभीर आरोप केला आहे.माझ्या नकळत,माझ्या स्वाक्षरीची बनावट नक्कल (फोर्जरी) करून हा अर्ज सादर करण्यात आल्याचा खळबळजनक दावा पानसरे यांनी केल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उभे असलेले करण ससाणे यांच्यासह इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याचे सांगितले जात होते.दुपारी तीन वाजेच्या सुमारास महायुतीच्या गोटातून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाल्याचा दावा अतिशय आत्मविश्वासाने केला जात होता. मात्र,हाच आनंद साजरा होत असताना बरोबर दुपारी ३ वाजता अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला.त्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेत, आपण कोणताही माघारीचा अर्ज दिला नसून आपल्या नावावर सादर झालेला अर्ज पूर्णपणे खोटा आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.दत्ता पानसरे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली.”माझ्या पाठीमागे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय दबावापोटी हा कट रचला गेला आहे.जर मला न्याय मिळाला नाही,तर माझ्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.दत्ता पानसरे यांनी लेखी स्वरूपात आरोप केला आहे की, त्यांच्या अर्जावरील स्वाक्षरी ही त्यांची मूळ स्वाक्षरी नसून ती बनावट आहे.अर्ज माघारी घेण्याची वेळ टळल्यानंतर हा वाद समोर आल्याने निवडणूक नियमावलीनुसार आता नेमकी काय कारवाई करावी, याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.आता या संपूर्ण प्रकरणावर अहिल्यानगरचे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग काय कायदेशीर निर्णय घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
