
अहमदनगर (दि.४ ऑक्टोबर):-अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी सकाळी निघाले होते त्यामुळे शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले होते.
अहमदनगर महानगरपालिकेच्या संपामध्ये आरोग्य विभाग,अग्निशामक विभाग आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वगळता सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.हा लाँग मार्च नगर वरून निघून भळवणी पर्यंत पोहचला होता.लाँग मार्चचा आजचा तिसरा दिवस होता.आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठका घेऊन अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून बुधवारी सकाळी आमदार संग्राम जगताप यांनी लॉंग मार्च साठी निघालेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची भाळवणी येथे जाऊन भेट घेतली आणि मुंबई झालेल्या सर्व घटनाक्रमाबाबत सविस्तर माहिती देत सरकारने दिलेल्या आश्वासनाबाबत माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले लेखी पत्र घेऊन आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका कर्मचारी युनियन अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्या कडे देण्यात आले.या पत्रात दहा ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली असून 10 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीबाबत तसेच सफाई कामगार यांच्या वारसहक्काच्या मागणी बाबत आणि महानगरपालिका आस्थापनावरील अधिकारी/कर्मचारी व सफाई कामगार यांचा आकृतीबंध मंजूर असताना कोणतीही भरती अद्यापपर्यंत झाली नसल्याबाबत ही बैठक घेण्याचे लेखी पत्र देण्यात आल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांनी आपला लॉंग मार्च मागे घेतला आहे.आणि उद्यापासून महानगरपालिकेचे कामकाज सुरळीत होणार आहे.
मुंबई येथे होणाऱ्या बैठकीला अहमदनगर महानगरपालिकेचे कामगार युनियनचे पदाधिकारी तसेच अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप,वित्त विभागाचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासनाचे मुख्य सचिव,नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, नियोजन विभागाचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव,अहमदनगरचे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्या समवेत ही बैठक मुंबई येथे पार पडणार आहे.या वेळी अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे,उपायुक्त डॉ. प्रशांत पठारे,पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम,उपमहापौर गणेश भोसले,नगरसेवक अविनाश घुले माजी नगरसेवक आरिफ शेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे,सरचिटणीस आनंद वायकर,बाबासाहेब मुदगल,महादेव कोतकर गुलाब गाडे,राहुल साबळे विठ्ठल उमप आदींसह कर्मचारी उपस्थित होते.