
अहमदनगर (दि.११ फेब्रुवारी):-मुलांचे लग्न जमिवण्यासाठी माता-पित्यांना माेठी कसरत करावी लागते.

प्रयत्न करूनही इतक्या सहजासहजी जमत जुळत नाहीत. वधू-वर मेळाव्याच्या माध्यमातून मात्र माता-पित्यांचा त्रास कमी होऊन एकाच दिवसात लग्न जमतात आणि अनुरूप वधू अथवा वर मिळतो. म्हणून वधू-वर मेळाव्यांचे आयोजन ही काळाची गरज बनली आहे. असे प्रतिपादन प्रा.आमदार राम शिंदे यांनी केेले.
धनगर समाज सेवा संघाच्या वतीने रविवारी शहरातील सावेडी उपनगरातील गंगा लॉन येथे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आ. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बाेलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप,संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, व्याख्याते किसन आटोळे, उद्योजक शशिकांत राहिंज, संघाचे मार्गदर्शक निशांत दातीर, विठ्ठलराव वाडगे, दत्तात्रय गावडे, अशोक राशीनकर, भास्कर फणसे, डॉ. नामदेव पंडित, अनिल ढवण, डॉ. अशोक भोजने, गोवर्धन सरोदे, ज्ञानदेव धोडके आदी उपस्थित होते.
आ. शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्याबाई होळकर नगर नामांतराची चोंडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती. याबाबत मी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला आहे. पुढील वर्षी अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. त्याआधी जिल्ह्याचे नामांतर झालेले असेल. या नामांतराचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून कुणीही विरोध केलेला नाही. तसेच भाजप सरकारच्या कार्यकाळातच धनगर आरक्षणाचाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले.
संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड म्हणाले गेल्या आठ वर्षांपासून आम्ही धनगर समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजन करत असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. राज्यभरातून समाजबांधव या मेळाव्याला उपस्थित राहतात. या माध्यमातून अनेकांचे लग्न जमते. त्यामुळे नाते जोडणारा हा मेळावा आहे. यावेळी आ. जगताप यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत तागड, सोपानराव राहिंज, वसंतराव दातीर, हरिश्चंद्र करडे आदींनी परिश्रम घेतले.