नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू करण्यात आले असून या विविध मागण्या मनपा प्रशासनाने मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण करते अशोक गायकवाड व विजय भांबळ यांना लेखी पत्र देऊन नारळ पाणी देताना मनपा आयुक्त यशवंत डांगे समवेत निवृत्ती आरु, एन.एम. पवळे, आरिफ शेख, अमित काळे, विनोद भिंगारदिवे, सुजित घंगाले, उत्तमराव साठे, बापू गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रा.भिमराव पगारे, निलेश तोरणे, छानराज क्षेत्रे, राजू वाघ, यादव भिंगारदिवे, शरद गाढवे, अमोल अल्हाट, सागर अल्हाट आदीसह आंबेडकरी चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे लेखी पत्रात म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची फिनिशिंग राहिलेली असून ती झाल्यानंतर लवकरात लवकर पुतळा उभारण्यात येईल तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येत्या १५ दिवसात पुतळा उभारण्याची तातडीने कार्यवाही करण्यात येईल तसेच मार्केट यार्ड चौकातील पूर्णकृती पुतळा उभारल्यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थापना करण्याबाबत बैठक घेऊन योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल व अहिल्यानगर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्ण बांधणी करून सुसज्ज ग्रंथालय अभ्यासिका जी उभारणी करण्याचा आराखडा महापालिकेचे प्रकल्प सल्लागार स्पनेक्स ए.इ.सी.सोल्युशन प्रा लिमिटेड पुणे यांनी तयार केला असून निधीची मागणी केलेली आहे.
निधी उपलब्ध झाल्यानंतर लवकरात लवकर पुढील कारवाई करण्यात येईल. व अहिल्यानगर मधील सामाजिक न्याय भवन इमारतीचे प्रवेशद्वार व संरक्षण भिंतीचे कामाबाबत मंजूर विकास योजनेनुसार असणारा १८ मीटर रस्ता असून तो १२ मीटर करण्याची मागणी आहे. प्रत्यक्ष जागेवर सर्व संबंधित खात्यासह अधिकारी पाहणी करून १५ दिवसात निर्णय घेऊन संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम अल्पसंख्यांक विभाग भारत सरकार यांचे योजनेतून महापालिकेच्या मौजे पिंपळगाव तलावाजवळील जागेत मेडिटेशन हॉल ध्यानधारणा केंद्र उभारण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले.
