नगर (प्रतिनिधी/सागर साळवे):-दीन दलित कष्टकरी श्रमिक शोषित वंचिताच्या व्यथा आपल्या साहित्यात मांडणारे परिवर्तनवादी साहित्यिक लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे,छत्रपती शिवरायांचा पोवाडा परदेशात जाऊन गाणारे,मराठी भाषेचा झेंडा साता समुद्रापार फडकवणारे,जगातील सतावीस भाषेत ज्यांचे साहित्य प्रकाशित आहे असे लोकप्रबोधनकार डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे नाव यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसर किंवा साहित्य संमेलन प्रवेशद्वारा साहित्य संमेलन विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास वा ठिकाणास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे देण्यात आले.
निवेदनात म्हटले की,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषितांच्या व्यथा साहित्यात शब्दबद्ध करून साहित्य क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे.मराठी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाणारे ते साहित्यिक आहेत.व्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारणारे जनसामान्यातील नायक नायिका त्यांनी साहित्यात उभे केले.उपेक्षित जनतेला ऊर्जा देणारे त्यांचे वास्तववादी आणि परिवर्तनवादी साहित्य संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशाच्या राजधानी असणाऱ्या दिल्ली मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या साहित्य संमेलन परिसरात प्रवेशद्वार विचार मंच यापैकी कोणत्याही स्थळास वा ठिकाणास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे ही विनंती अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेश शिरसाठ,शहर अध्यक्ष पावलस पवार, पाथर्डी कार्यध्यक्ष साहेबराव केंदळे, राहुरी शहराध्यक्ष बाळू घोरपडे,आदिसह पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.