संगमनेर प्रतिनिधी (दि.२८ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुन्हा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.कातकरी व भिल्ल समाजाच्या अल्पवयीन मुलांच्या अज्ञानपणाचा व गरिबीचा फायदा घेऊन वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून शेळ्या मेंढ्या सांभाळण्याचे जबरदस्तीने काम करून घेऊन त्यांची शारीरिक व मानसिक छळवणूक केल्याची घटना तालुक्यातील डिग्रस येथे घडली असून याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत गोकुळ देवराम हेलम यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात काल फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून पोलिसांनी अहिलाजी भिकाजी पुणेकर व किशोर लक्ष्मण वावरे दोघे राहणार डिग्रस तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध गुरनं/ 50/2023 भादंविक 374, बंधबिगार अधिनियम 1976 चे कलम 16,17,18 सह अनुसूचित जाती अधिनियम 1989 चे सुधारित 2015 चे कलम 3(1 ) एच व बालकामगार ( प्रतिबंध आणि विनियमन ) अधिनियम 1986 चे कलम 3,14 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहे.
