अहिल्यानगर (३० एप्रिल २०२५):-संकटग्रस्त,शोषित व उपेक्षित बालकांसाठी तीन दशके अहोरात्र झटणाऱ्या स्नेहालय संस्थेने आपल्या सामाजिक बांधिलकीला अधिक व्यापक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि तात्काळ परिणाम देणाऱ्या माध्यमात रूपांतरित करत,एक नवीन पाऊल उचलले आहे.१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘मुक्ती वाहिनी’ या विशेष हेल्पलाइन प्रकल्पाचे भव्य उद्घाटन करण्यात येत आहे.या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी,बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य, तसेच स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी, विश्वस्त,संचालक,आणि विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तीन दशकांची सामाजिक वाटचाल नव्या युगातील सेवेला सुरुवात
१९९० साली ‘मुक्ती वाहिनी’ या नावानेच स्नेहालयने बालहक्कांच्या लढ्याची ठाम सुरुवात केली.बालकांचे लैंगिक शोषण,बालविवाह,बालश्रम आणि बेघरपणाविरुद्ध आवाज उठवत ही चळवळ जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राज्यभर आणि देशभर पोहोचली.या कार्याच्या भरवशावरच स्नेहालयाला चाईल्डलाइन इंडिया फाउंडेशनकडून ‘१०९८’ ही राष्ट्रीय बाल हेल्पलाइन जिल्ह्यात राबवण्याची जबाबदारी मिळाली,आणि ती २० वर्षे यशस्वीपणे राबवली.या कालावधीत हजारो बालकांना वाचवणे,न्याय मिळवून देणे आणि समाजात पुनर्प्रवेश मिळवून देणे हे संस्थेच्या कार्याचे मूळ राहिले.
‘मुक्ती वाहिनी’ चा जन्म अनुभव आणि गरजेची समजूत
अलीकडे केंद्र शासनाच्या धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे हेल्पलाइन यंत्रणेचे केंद्रीकरण झाले असून,कार्यभार आणि प्रतिसाद वेळेत काही मर्यादा जाणवू लागल्या.स्नेहालयने कोणत्याही यंत्रणेला पर्याय न ठरवता,त्यांचे पूरक म्हणून ‘मुक्ती वाहिनी’ ही सेवा सादर करण्याचा निर्णय घेतला.ही सेवा स्थानिक गरजांनुसार, अधिक तत्पर, समर्पित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम हस्तक्षेपासाठी कार्यान्वित केली जात आहे.
डॉ.गिरीश कुलकर्णी यांची प्रतिक्रिया
‘मुक्ती वाहिनी’ ही आमच्या तीन दशकांच्या कार्याला नव्या उंचीवर नेणारी पुढची पायरी आहे. कोणत्याही यंत्रणेला पर्याय न होता, ही सेवा त्यांच्याशी हातात हात घालून काम करेल. कोणताही बालक संकटात असताना त्याच्यापर्यंत वेळेत, संवेदनशील आणि सक्षम मदत पोहोचणे – हेच आमचे ध्येय आहे.”
प्रविण कदम प्रकल्प व्यवस्थापक उडान प्रकल्प,स्नेहालय मो.9011026495