अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मागील भांडणाच्या कारणातून तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) शहरअध्यक्ष तसेच माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह मच्छिंद्र झेंडे (रा.चिखली,ता.श्रीगोंदा), लालू, लोखंडे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्यासह अनोळखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रवींद्र रामराव शेळके (रा. कोल्हेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी रवींद्र शेळके हे अभिषेक कळमकर यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते. शेळके यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आर्थिक कारणातून वाद झाल्याने मी त्यांचे काम सोडले होते. याचा राग त्यांना होता. सोमवार (ता.१२) रोजी मी वाकोडी येथे दुचाकीवरून जात असताना एका चारचाकी वाहन माझ्या दुचाकी वाहनाला आडवे लावले.
त्या वाहनातून एक अज्ञात व्यक्ती खाली उतरून मला चारचाकी वाहनात बळजबरीने बसवून चिखली येथे नेले. तेथे मच्छिंद्र झेंडे व अभिषेक कळमकर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर एका महिलेसोबत फोटो काढून काही कागदावर सह्या घेतल्या. माझे पैसे दे, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
