संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-लोकशाही,समाजवाद आणि समता यांसारख्या मूलगामी मूल्यांसाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रसेवा दल या ऐतिहासिक संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी डॉ.सागर भालेराव यांची नियुक्ती झाली असून,ही नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतःचंदनापुरी व संगमनेर परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आता डॉ.सागर भालेराव राष्ट्रीय पातळीवर संघटनेच्या कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.डॉ.सागर भालेराव हे मुंबई विद्यापीठाचे पत्रकारितेचे पदवीधर असून,पत्रकार, लेखक,अनुवादक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी कार्यव्याप्ती आहे. छात्रभारती विद्यार्थी चळवळ आणि राष्ट्र सेवा दलात त्यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांची विचारशील आणि प्रगल्भ कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.
सध्या मुक्त पत्रकार म्हणून काम करणारे डॉ.सागर भालेराव फुले-शाहू-आंबेडकर विचारांवर आधारित लेखन करत असतात. ‘मीडिया फॉर डेमोक्रसी’ हा त्यांचा उपक्रम देशभरात खूप गाजला असून,याच्या माध्यमातून त्यांनी माध्यमशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संविधान साक्षरता आणि माध्यम साक्षरतेचा प्रचार व प्रसार केला आहे.या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.डॉ.भालेराव यांनी जनकवी शैलेंद्र यांच्या सिनेगीतांवर पीएच.डी.केली असून,त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अभ्यासात संशोधनाची ठळक छाप आहे.मलेशिया आणि थायलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भारतातील राजकीय व सामाजिक प्रश्नांवर आधारित संशोधन सादर केलं आहे.तसेच त्यांच्या लेखनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये स्थान लाभले आहे.अपंगत्व अधिकार,बालसंरक्षण, पर्यावरण,आणि लैंगिक समता यासारख्या विषयांवर त्यांनी संशोधनासोबतच जनजागृती केली आहे.
शाहीरी सादरीकरण, कार्यशाळा,प्रशिक्षण शिबिरे आणि क्षेत्रीय अभ्यास दौरे यांच्या माध्यमातून त्यांनी युवकांमध्ये सामाजिक भान आणि सक्रिय नागरिकत्वाची जाणीव निर्माण केली आहे.त्यांनी राजस्थान,उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली येथील तरुण कार्यकर्त्यांसोबत काम केल्यामुळे त्यांचा कार्यव्याप्तीचा प्रदेशही व्यापक आहे. डॉ.भालेराव यांच्या या निवडीमुळे राष्ट्र सेवा दलाच्या नव्या नेतृत्वाला नव्या विचारांची जोड मिळेल,असा विश्वास पुरोगामी कार्यकर्ते आणि संघटनेचे सदस्य व्यक्त करत आहेत.अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रभरातील पुरोगामी विचारांच्या संघटनांनी डॉ. भालेराव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून,ही निवड सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.