विशाल गणपतीच्या चरणी युतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा.. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा भव्य आणि उत्साही प्रारंभ ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला.या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा श्रीगणेशा झाला.

विशाल गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसह कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. महायुतीच्या या शक्तिप्रदर्शनामुळे नगरच्या राजकीय वातावरणात चांगलीच रंगत निर्माण झाली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,आज राज्यभरात अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत.याचे एकच कारण आहे विरोधकांकडे उमेदवारच उरलेले नाहीत.महायुतीच्या विकासकामांवर जनतेचा प्रचंड विश्वास आहे.ते पुढे म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले असून विकास,स्थैर्य आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळेच जनता महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.नगर महापालिकेतही महायुतीला जनतेकडून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेतले जातील.आमदार संग्राम जगताप यांनीही महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांना जोमाने प्रचार करण्याचे आवाहन केले.या प्रचाराच्या प्रारंभीच महायुतीने दाखवलेली एकजूट, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेत्यांचा आत्मविश्वास पाहता अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुतीची बाजी प्रबळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
