अहमदनगर प्रतिनिधी (दि.२३ मार्च):-घटनेतील आरोपी नामे रविंद्र मोहन कोपरगे (वय ३२ वर्षे,रा.इंदीरानगर,शेवगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) याने ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा.पी.आर.देशमुख साहेब अतिरिक्त व विशेष (पोक्सो कोर्ट) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३७६,३७६ ( अ ) ( ब ) ( २ ) ( आय ) ( जे ) तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ४ व ६ नुसार दोषी धरून प्रत्येकी गुन्हयानुसार आरोपीस १० वर्षे सक्त मजुरी व रूपये ५,००० / – दंड व दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैदेची शिक्षा सुनावली.सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे – शिंदे यांनी पाहिले.सदर खटल्याचा निकाल हा अतिशय कमी कालावधीत म्हणजेच केवळ ९ महिन्यामध्ये लागलेला आहे.घटनेची थोडक्यात हकीगत की दिनांक ०१.०६.२०२२ रोजी रात्री ८ चे सुमारास मौजे शेवगाव शहरातील इंदिरानगर येथील राहणारा आरोपी नामे रविंद्र मोहन कोपरगे याने ५ वर्षीय वयाची अल्पवयीन पिडीत मुलगी हीस मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याचे घरी नेवून तिच्यासोबत अनैसर्गिक शारिरीक अत्याचार केला.सदर घटनेची फिर्याद पिडीत मुलीचे आईने शेवगाव पोलिसांसमोर दिली . त्यानुसार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होवून सदरचा तपास ए.पी.आय.आशिष शेळके यांनी पूर्ण करून मा . न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले . यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी,पिडीतेची आई,पंच साक्षीदार तपासी अधिकारी , वयासंदर्भात नगर परिषद पाथर्डीचे रजिस्टार क्लर्क श्री . अंबादास साठे व वैद्यकिय अधिकारी डॉ.गहिनीनाथ खेडकर सिव्हील हॉस्पिटल अहमदनगर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या,सरकारी वकीलांनी युक्तीवाद केला की,सदर घटनेमधील मुलगी ही पाच वर्षे वयाची लहान चिमुरडी आहे.आरोपीने तिला विश्वासात घेवून त्याच्या घरी नेऊन तिच्याशी वाईट कृत्य केले आहे.घटनेनंतर पिडीत मुलीच्या बालमनावर अतिशय वाईट परिणाम झालेला आहे.घटनेस नऊ महिन्याचा कालावधी होवून गेलेला असला तरीही आजही पिडीत मुलीच्या मनावर अतिशय तिव्र स्वरूपात परिणाम झालेला असून ती आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे.सदरची केस पाहता नुकतीच उमलत असलेल्या कळीवर आरोपीने असे हीन कृत्य करून तिचे संपूर्ण आयुष्य खुडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे या केसमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा दिली तर समाजातील विकृतींवर आळा बसेल व अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडून येणार नाहीत.सदरच्या केसमध्ये सरकारी वकीलांनी पिडीत मुलीशी बोलवून तिच्या मनातील भिती घालवण्याचा पुरेपुर प्रयत्न केलेला आहे.परंतु घटनेमुळे तिच्या मनावरील ओरखडे कधीच बरे होणार नाहीत.सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद व केस मध्ये झालेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली.सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी.केळगंद्रे/शिंदे यांनी पाहिले.त्यांना पैरवी अधिकारी राणी बोर्डे तसेच पोकॉ/विजय गावडे,पोकॉ/ खंडागळे यांनी सहकार्य केले .
