
अहमदनगर (दि.१६ ऑक्टोबर):- वसा विकासाचा, विचार बहुजनांचा हा विचार आपण संपूर्ण राज्यभर मांडत आहोत.

जनतेचा विकास हाच आपला ध्यास असून विकास कामातुन जनसामान्यांना सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली.पारनेर-अहमदनगर विधानसभा मतदारसंघात एलटी,एचटी 565 विद्युत वहिनी, 100 के.व्ही.च्या 336 रोहित्र उभारणीच्या कामाचे भूमिपूजन तसेच माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार निलेश लंके,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.जलसंधारणांची कामे, पाझर तलाव, पाणंद रस्ते, क्रीडाविकास, आरोग्य विकास, विविध इमारती यासारखी विकास कामे करण्यात आली आहेत. नागरिकांची मागणी असलेल्या उपसा सिंचन योजना, कोल्हापुरी बंधारे, तीर्थक्षेत्र विकास,रस्ते विकास, औद्योगिक विकास यासारख्या विकास कामांनाही निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पारनेर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिली.
माता मोहटादेवीचे महिलांना दर्शन घडविण्याचे काम पुण्यांचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहटादेवीचे महिलांना अखंडितपणे दर्शन घडविण्याचे काम आमदार निलेश लंके हे गेल्या सात वर्षांपासून करत आहेत. भाविकांची देवीप्रती असलेली श्रद्धा जपण्याचे श्री लंके यांचे काम उत्तम प्रकारचे व पुण्यांचे आहे. लोकसेवेचा वसा घेऊन जनतेच्या विकासासाठी अहोरात्र करण्यात येणारे आमदार लंके यांचे काम हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.आमदार निलेश लंके यांनी प्रास्ताविकात माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेबाबत तसेच मतदारसंघातील विकासकामांची माहिती विषद केली.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 11 के.व्ही. क्षमतेची 278 किलोमीटर लांबीची वीज वाहिनी, 100 के.व्ही. क्षमतेचे 333 रोहित्रे तसेच 310 किलोमीटर लांबीची थ्री फेज लघुदाब वाहिनीच्या कामाचे भूमीपुजन कोनशिला अनावरणाने करण्यात आले. तसेच माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रेचा शुभारंभही करण्यात आला.कार्यक्रमास तालुक्यातील पदाधिकारी, अधिकारी, महिला तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.