
नगर (दि.२५ प्रतिनिधी):-देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केला आहे.विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहीलेले नाहीत त्यामुळेच संविधान बदलाची भाषा करुन, दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाही नव्हे तर, विरोधकांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची टिका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते. पक्षाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे,महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड,शहर जिल्हाध्यक्ष अनाप पाटोळे,युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे,उत्तर महाराष्ट्राचे सचिव अजय साळवे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते.आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात झालेल्या योजनारुपी कामांमुळेच देशातील सर्व समाज घटक एकत्रित आले आहेत.
आठवले साहेबांसारख्या नेतृत्वाला देशपातळीवर काम करण्याची संधी दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय व आधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय वयोश्री योजना यशस्वीपणे राबविली गेले.नगर जिल्हा या योजनेत अग्रस्थानी राहीला असल्याचे त्यांनी सांगितले.कॉंग्रसे पक्षाने नेहमीच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला.आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे सामाजिक न्यायाची प्रक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षात संपूर्ण देशात राबविली आहे. संविधानाचा सन्मान म्हणून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.तरीही विरोधक जाणीवपुर्वक संविधान धोक्यात आल्याची करीत असलेली टिका अत्यंत निरर्थक आहे. संविधान आणि लोकशाही कुठेही धोक्यात आलेली नाही तर,यांचे विरोधकांचे राजकारणच धोक्यात आल्याने जाणीवपूर्वक अस्तित्वासाठी अशी वक्तव्य केली जात असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
राज्य सरकारने इंदू मिल येथील जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.लंडन येथील त्यांच्या निवासस्थानालाही स्मारकाचा दर्जा दिला आहे.महाविकास आघाडीला हे कधी सुचले नाही.केवळ सामाजिक व्देश निर्माण करण्याच प्रयत्न झाला असल्याची टिका त्यांनी केली.याप्रसंगी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी गावोगावी तसेच वाड्या वस्त्यांवर जावून मतदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले.