
अहमदनगर (दि.१० जुन प्रतिनिधी):-येथील आकाश बायजूस कंपनीत काम करणार्या कर्मचार्याने विद्यार्थी व पालकांकडून घेतलेली क्लासची ३ लाख ८५ हजार ४७७ रुपयांची फी कंपनीकडे जमा न करता पसार झाला आहे.तसेच तो दोन लॅपटॉप व एक टॅब घेऊन गेला आहे. कंपनीची ४ लाख ७५ हजार ४७७ रुपयांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी बायजूस कंपनीचे अहमदनगर ब्रँच मॅनेजर मृत्युंजय तापेश्वर सिंग (रा.तपोवन रस्ता, सावेडी,मूळ रा. मोरवाडी,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी सचिन भागीरथ भटाटे (मूळ रा. इगतपुरी) याच्या विरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.७ जून रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन भटाटे याने आकाश बायजूस कंपनीच्या क्लासची फी म्हणून विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून ३ लाख ८५ हजार ४७७ रुपये स्वतःच्या खात्यात तसेच रोख स्वरूपात घेऊन ते पैसे कंपनीकडे जमा न करता फसवणूक केली तसेच विश्वासाने त्यांच्या ताब्यात दिलेले दोन लॅपटॉप व एक टॅब असा एकूण ४ लाख ७५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज स्वतःच्या वापराकरिता घेऊन पळून गेला असे फिर्यादीत म्हटले आहे.तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार देवराम ढगे हे करत आहेत.