अहिल्यानगर (दि.२७ प्रतिनिधी):-स्नेहालय संस्थेने आयोजित केलेल्या 3 दिवसांच्या निवासी सेवा संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन सत्र संपन्न झाले.हि कार्यशाळा पुढील तीन दिवस स्नेहालय संस्थेमध्ये सुरु असणार आहे.या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ५० सामाजिक संस्थांचे संस्थापक सहभागी झाले असल्याचे कार्यशाळेचे निमंत्रक स्नेहालयाचे विश्वस्त शशिकांत सातभाई यांनी सांगितले.
स्नेहालाय संस्थेचे पालक मिलिंदजी कुलकर्णी यांनी स्वागत प्रसंगी “सर्व समविचारी संस्था एकत्रित येऊन एक विचाराने काम करतील, तेव्हा अनेक सामाजिक कार्य उत्तमरीत्या पार पाडू शकतात.”असे विचार व्यक्त केले.तसेच विश्वस्त राजीवजी गुजर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले,यावेळी स्नेहालय संस्थेचे कार्याध्यक्ष अनिलजी गावडे आणि कार्यशाळेतील सहभागी संस्थांचे प्रमुख आदी उपस्थित होते.
विशिष्ट सामाजिक उद्दिष्टांसाठी भारतात सर्वाधिक सामाजिक संस्था आणि संघटना महाराष्ट्रात स्थापन केल्या गेल्या. आजही महाराष्ट्र राज्य यात अग्रणीच आहे. तथापि विशेषतः नवोदित संस्थांना सेवाकार्याचे व्यवस्थापन, ध्येय उद्दिष्टांची स्पष्टता, संस्थेची मूल्यप्रणाली , बाह्य आणि अंतर्गत अनुपालन,कामाचे नियोजन,मानवी आणि आर्थिक संसाधनांचे व्यवस्थापन,तंत्रज्ञानाचा उपयोग,संस्थांतर्गत प्रक्रियांचे दृढीकरण, समाज माध्यमांचा वापर आणि प्रसिद्धी तंत्र, निधी संकलन आणि आर्थिक व्यवस्थापन, संघटन शास्त्र,विविध स्वरूपाच्या अधिस्वीकृती – अनुन्याप्ती आणि परवाने यांची प्राप्ती, कामाची कायदेशीर चौकट इत्यादी विषयांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असते.
संस्था उभारणीपेक्षाही सामाजिक प्रश्नावरील मूलभूत आणि समन्वयीत काम स्नेहालयने नेहमीच महत्त्वाचे मानले.त्यामुळे आपल्यासारख्या असंख्य सामाजिक उपक्रमांची आणि संस्थांची उभारणी करण्यासाठी निरपेक्ष योगदान देणे हे स्नेहालयच्या कार्याचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.अनौपचारिक स्वरूपात असंख्य संस्थांना क्षमता विकासासाठी स्नेहालय गेली तीन दशके मदत करीत आले.तथापि या विषयावर सातत्यपूर्ण प्रशिक्षण सेवा संवर्धन कार्यशाळेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे.
कार्यशाळेत व्यवस्थापन तज्ञ शशिकांत सातभाई, माध्यमतज्ञ रीमा अमरापुरकर,बजाज फिन्सर्वचे निवृत्त सामाजिक दायित्व विभाग प्रमुख अजय साठे,सेवाकार्याचे अभ्यासक हर्षु घाटे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संचालक प्रा.डॉ.रमेश जारे आदी १४ तज्ञ संवादक सहभागी झाले आहेत.श्रीमती जया जोगदंड,अनिल गावडे , डॉ.प्रीती भोम्बे,संजय गुगळे,गीता कौर,हनीफ शेख,संजय चाबुकस्वार, अजित जगताप,विकास सुतार आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.यापुढे भविष्यात अशा ३ दिवसांच्या निवासी कार्यशाळा सातत्याने आयोजित केल्या जाणार असून प्रत्येक तुकडीत ५० संस्था प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.