अहिल्यानगर (दि.५ फेब्रुवारी):- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरातील रामा ससाणे खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. नितेश राणे व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी ससाणेनगर येथे भेट देऊन घटनेतील जखमी पीडित हिंदू मातंग बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते तसेच नगर शहर, कर्जत,जामखेड,दौंड व पुणे येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री राणे व आमदार संग्राम जगताप यांनी पीडित कुटुंबीयांचे पुनर्वसन,फरार आरोपींना तात्काळ अटक आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोरील उपोषणस्थळी भेट दिली.अविनाश घोडके यांच्यासह रोहन ससाने आणि संदीप ससाने यांनी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आले.यावेळी स्थानिक पोलीस निरीक्षक किरण शिंदे, तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौज फाटा तैनात होता.मंत्री राणे व आमदार संग्राम जगताप यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर घटनेतील प्रत्यक्षदर्शी समाज बांधवांकडून घटनेची माहिती घेतली.यावेळी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी सरकारची ठाम भूमिका मांडली.
“दिवाळीच्या कालावधीत काही जिहाद्यांनी दगडफेक करून हिंदू समाजाला त्रास दिला. हे सरकार हिंदू बांधवांवरील अन्याय सहन करणार नाही. कुरेशी नावाचा जिहादी कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण करू शकणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी कडक कार्यवाहीचे आश्वासन दिले.यावेळी संग्राम जगताप म्हणाले की जिथे हिंदू धोक्यात तिथे मी ठामपणे उभा आहे त्यामुळे हिंदू बांधवांनो तुम्ही निशंक रहा तुमच्या मागे संग्राम भैय्या आहे.