अहिल्यानगर (दि.२२ मार्च प्रतिनिधी):-“बालविवाहमुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे!” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत, स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाने महिला दिनाचे औचित्य साधून बालविवाह रोखणाऱ्या आणि समाजप्रबोधन करणाऱ्या साहसी बालवीरांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला. या वेळी १६ मुलींना सायकली आणि ६० मुलींना अन्नधान्य व किराणा वाटप करून त्यांच्या सशक्तीकरणाला नवी दिशा देण्यात आली.
बालविवाहविरोधातील निर्भय लढा ३ लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत जनजागृती!
उडान प्रकल्पाच्या साहसी बालवीरांनी ३२० हून अधिक पथनाट्य प्रयोगांद्वारे ३ लाखांहून अधिक नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. गावागावांत, शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन त्यांनी समाजाला बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून देत, अनेक बालविवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महानगरपालिकेचा संकल्प ‘बालविवाहमुक्त जिल्हा’ करण्याचा निर्धार!
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त मा. यशवंत डांगे यांनी महानगरपालिका आणि स्नेहालयच्या संयुक्त प्रयत्नातून अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.
“अहिल्यानगर शहरातून बालविवाह रोखण्यासाठी आम्ही मंडप व्यावसायिक, भटजी, आचारी आणि कुटुंब प्रमुख यांची संयुक्त बैठक घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवू. तसेच, स्नेहालयच्या सहकार्याने झोपडपट्टीतील मुलांसाठी बालभवन प्रकल्प आणि महानगरपालिका शाळांमध्ये आदर्श शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
स्नेहालयचा पुढाकार समाजपरिवर्तनाच्या दिशेने दृढ पाऊल!
स्नेहालय संस्थेचे विश्वस्त श्री. राजीव गुजर यांनी लाभार्थी मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करताना सांगितले, “बालविवाह रोखणे ही केवळ सुरुवात आहे. या मुलींनी पुढे शिकून सक्षम व्हावे यासाठी स्नेहालय त्यांना सर्वतोपरी मदत करेल.”यावेळी उडान प्रकल्पाच्या मा. संचालक ॲड. बागेश्री जरंडीकर म्हणाल्या, “ही मुलं केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी लढत आहेत. त्यांची जिद्द आणि संघर्ष हा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” स्नेहालय संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी यांच्या उडान प्रकल्पा अंतर्गत बालविवाह मुक्ती मिशन सुरू आहे. जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा 2027 पर्यंत करण्याचे ध्येय करण्यासाठी डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी सुरू आहे.
‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ – समाज परिवर्तनासाठी संकल्पबद्ध योगदान!
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी स्नेहालय अनिवासी प्रकल्प विभागाचे संचालक श्री. हनीफ शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच उडान प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक प्रवीण कदम यांनी उपस्थितांसह ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेतली, जिथे सर्वांनी बालविवाह रोखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशामागे…
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर शाहिद शेख, पूजा दहातोंडे, शशिकांत शिंदे, समुपदेशक प्रियंका मते, ज्ञानेश्वर वाघ,संगीता सानप तसेच संपूर्ण स्नेहालय टीमने अथक परिश्रम घेतले.
‘एकत्र येऊन घडवूया – बालविवाहमुक्त समाज!’
आपला नम्र-प्रविण कदम-प्रकल्प व्यवस्थापक,मो.9011026495