अहमदनगर प्रतिनिधी(दि.९ फेब्रुवारी):-नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात शेतीच्या वादातून बुधवारी दि.८ फेब्रुवारी रोजी तुफान राडा झाला आहे.नगरमधील बांधकाम व्यावसायिक व शेती मालक आणि त्यांच्या मित्रावर २० ते २५ जणांच्या जमावाने तुफान दगडफेक करून एकावर कोयत्याने वार करत त्याच्या जवळ असलेली परवाना असलेली रिव्हॉल्वर हिसकावून घेत त्याच्या डोक्यास लावून ठार मारण्याचीही धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे.नगर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ५ जणांना पकडले असून आरोपींनी पळविलेली रिव्हॉल्वर जप्त केली आहे.याबाबत नगरमधील शेती व बांधकाम व्यावसायिक उत्कर्ष सुरेश पाटील (वय ४४, रा.श्रमिक,आनंदऋषीजी मार्ग,अहमदनगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी पाटील यांची नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद शिवारात शेत जमीन आहे. बुधवारी (दि.८) दुपारी १२ च्या सुमारास ते बाबुर्डी बेंद शिवारात हॉटेल राजवीर जवळ असलेल्या त्यांच्या शेतात काही सहकाऱ्यांसह गेले होते व त्यांच्या जमिनीत असलेले पत्र्याचे शेड जेसीबी च्या सहायाने काढत असताना तेथे मनोज चोभे (रा.बाबुर्डी बेंद,ता.नगर) याच्यासह २० ते २५ जण आले.त्यांनी पाटील यांच्याशी जमिनीवरून वाद घालण्यास सुरुवात केली.वाद वाढत गेल्याने या जमावाने पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांवर तुफान दगडफेक सुरु केली.पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
