अहिल्यानगर शहर हादरलं…सावकारकीच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या..दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एक कोटी रुपयांचे कर्ज व्याजासह परतफेड करूनही अधिक रकमेची मागणी आणि सततच्या छळाला कंटाळून सारसनगर येथील एका ४२ वर्षीय व्यावसायिकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघा सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृत व्यावसायिकाचे नाव मयूर रंगनाथ खेंडके (वय ४२,रा.त्रिमूर्ती चौक, सारसनगर) असे असून,त्यांनी कर्जदारांच्या सततच्या जाचामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी मयूर यांच्या पत्नी पुष्पा मयूर खेंडके (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
कर्ज परतफेडीनंतरही चालू होता सावकारांचा तगादा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयूर खेंडके यांनी आरोपी प्रविण अनिल सुंबे (रा.महात्मा फुले चौक,सारसनगर) आणि पंकज राजू भोसले उर्फ सोनू शेठ (रा. भोसले आखाडा) यांच्याकडून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते.सदर कर्जाची रक्कम मयूर यांनी व्याजासह परतफेड केली होती. तथापि,या दोघा सावकारांनी व्याजापोटी आणखी रकमेची मागणी करत वारंवार मयूर यांच्याकडे तगादा लावण्यास सुरुवात केली.सततच्या छळामुळे मयूर हे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते.
विष प्राशन करून जीवन संपवले
या छळाला कंटाळून मयूर खेंडके यांनी दि.२९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१६ वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.त्यांना तातडीने साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असतानाच दि.१ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेनंतर मयूर यांच्या पत्नी पुष्पा खेंडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण सुंबे आणि पंकज भोसले (सोनू शेठ) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाची पाहणी केली.पुढील तपास कॅम्प पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहे.शहरात बेकायदेशीर सावकारकीचे प्रमाण वाढले असून,कर्जाच्या व्याजाच्या ओझ्याखाली अनेक व्यापारी आणि सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून,नागरिकांनी प्रशासनाने अशा सावकारांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
