शहर वेठीस..नियम धुळीस..!अवजड वाहनांना मोकळे रान..वाहतूक शाखेची जबाबदारी कोण घेणार?..रस्त्यांवर भीतीचे साम्राज्य..! नागरिकांच्या जीवाशी खेळ..आणि वाहतूक शाखेची बघ्याची भूमिका..?
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही दिवसाढवळ्या ट्रक,डंपर,कंटेनर यांची सर्रास वर्दळ सुरू आहे. नियम कागदावर आणि रस्त्यावर मात्र बेदरकार वास्तव अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.शहर वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार आणि संशयास्पद शांतता यामुळे नगरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
🚛 बंदी असतानाही अवजड वाहनांचा सुळसुळाट
शहरातील प्रमुख मार्गांवर अवजड गाड्यांना विशिष्ट वेळेत बंदी असतानाही त्या विनाअडथळा फिरताना दिसतात.सकाळी शाळा-कॉलेजांची वेळ असो किंवा संध्याकाळची गर्दी ट्रक आणि डंपर नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसतात.प्रश्न असा उपस्थित होतो की,या गाड्या शहरात येतात तरी कशा? तपासणी नाके आहेत का केवळ नावापुरते?
💥अपघातांची साखळी,पण जबाबदार कुठे?
मागील दोन ते तीन दिवसांत नगर–मनमाड हायवे वर एका स्कार्पिओ चालकाने बेदरकार वाहन चालवत अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली.या प्रकाराने नागरिक दहशतीत आले.विविध भागांत छोटे-मोठे अपघात घडत असताना घटनास्थळी शहर वाहतूक शाखेचे अंमलदार वेळेवर दिसत नाहीत,अशी तक्रार स्थानिकांकडून होत आहे. अपघातानंतर नागरिकांनीच वाहतूक सुरळीत करण्याची वेळ येत असल्याचे चित्र आहे.
शहरात पॅगोवाल्यांकडून आणि रिक्षावाल्यांकडून सर्रास मलिदा घेतला जात असल्याची चर्चा रंगत आहे.नियमांची अंमलबजावणी दुय्यम आणि तडजोड प्राथमिक ठरत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार नेमकी कोणती भूमिका घेत आहेत बघ्याची की संगनमताची याबाबत संशयाची सुई फिरू लागली आहे.
सिग्नल तोडणे,राँग साईड, हेल्मेटशिवाय वाहनचालक
शहरातील प्रमुख चौकांवर सिग्नल तोडणे,राँग साईडने धावणारी दुचाकी,हेल्मेटशिवाय वेगाने जाणारे तरुण,रिक्षांची मनमानी पार्किंग हे सर्व रोजचेच झाले आहे.तरीही कारवाईचा वेग मात्र कासवगतीचा असल्याचे नागरिक सांगतात.नियम मोडणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे का,असा सवाल उपस्थित होत आहे.
🛑 नागरिकांचा संताप शिगेला
“अपघात झाला की पोलीस दिसत नाहीत,पण दंड वसूल करताना मात्र तत्परता दिसते,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या मालिकेमुळे नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
🔎 जबाबदारी निश्चित होणार का?
शहर वाहतूक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? अवजड वाहनांच्या प्रवेशावर कठोर नियंत्रण आणले जाणार का? अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केव्हा राबवली जाणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांच्या मनातील संशय आणि असुरक्षिततेची भावना कमी होणार नाही.अहिल्यानगरच्या रस्त्यांवर वाढते अराजक, नियमांची पायमल्ली आणि कारवाईतील ढिलाई या सर्वामुळे शहराची वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.आता तरी प्रशासन जागे होणार का,की नगरकरांनीच आपल्या जीवाची जबाबदारी स्वतः घ्यायची? असा संतप्त सवाल शहरभरातून उपस्थित होत आहे.
