E-Peek Pahani..शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..ई-पीक पाहणी नोंदणी २४ मे पूर्वी करा..जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आवाहन..नोंदणी न केल्यास…
अहिल्यानगर (प्रतिनिधी): – उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता राज्यात ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी आपल्या पिकांची अचूक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.पिकांची नोंदणी न केल्यास सातबारा उताऱ्यावर पीक नोंद कोरी राहील व ती नंतर भरता येणार नाही. परिणामी, अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारी मदत, पीक विमा तसेच शासकीय अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
शासन निर्णयानुसार ई-पीक पाहणी प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावर ८ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत, तर सहाय्यक स्तरावर २५ मे ते ८ जुलै २०२६ या कालावधीत पिकांची नोंद करण्यात येईल.उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड तसेच चालू स्थितीत पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्व तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी विहित कालावधीत मोबाईलद्वारे पीक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही श्री. आशिया यांनी केले आहे.
