Song..गायक आनंद शिंदेंच्या सुरांनी नगर ‘भीममय’..पांजारपोळ मैदानात जनसागर उसळला..नगरसेवक सुरेश बनसोडेंच्या संकल्पनेला ऐतिहासिक प्रतिसाद..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शहरात सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा अभूतपूर्व सोहळा पार पडला.शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘भीमगीत’ कार्यक्रमाने संपूर्ण शहर भीममय झाले असून,हजारोंच्या उपस्थितीने हा सोहळा ऐतिहासिक ठरला.माळीवाडा येथील पांजारपोळ मैदानात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या पहाडी आवाजात सादर झालेल्या भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, लाल दिव्याच्या गाडीला यांसारख्या गीतांवर भीमसैनिकांनी एकच जल्लोष केला.कार्यक्रमाचे उद्घाटन शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उत्साहात झाले. यावेळी त्यांनी गायक आनंद शिंदे यांचा विशेष सत्कार केला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,जोतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महिनाभर चालणार भीमउत्सव नगरसेवक सुरेश बनसोडे
यावेळी बोलताना नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे म्हणाले की, “अहिल्यानगरमध्ये भीम उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो बुद्ध पौर्णिमेपर्यंत महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाईल.१४ एप्रिल रोजी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.”
पूर्णाकृती पुतळा हे प्रेरणास्थान: आ.संग्राम जगताप
आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहरात सुरू झालेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार झाले आहे. हे स्थळ केवळ स्मारक नसून समाजासाठी ऊर्जा देणारे शक्तीस्थान ठरेल.”
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी जयंती महोत्सव समितीचे अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड,किरण दाभाडे, प्रा.जयंत गायकवाड,विलास साठे,शरद मेढे,अंकुश मोहिते, पप्पू पाटील,मुन्ना भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव,समीर भिंगारदिवे,सतीश शिरसाट,जय कदम,विशाल कांबळे,प्रा.डी. आर.जाधव,सचिन शेलार,सागर ठोकळ,गौरव साळवे,गौतमीताई भिंगारदिवे,येसुदास वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
