
अहमदनगर (दि.२२ मार्च):-महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती कल्याण,शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग,कुष्ठरोगी यांच्या साठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करावा सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाज सेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत यासाठी शासनाने सन १९७१-७२ पासून त्या व्यक्तींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार समाजभूषण पुरस्कार योजना सुरू केलेली आहे.
याच योजनेतून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावचे रहिवासी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष (A) श्री.विजय जगताप यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कार्य करताना विजय जगताप यांनी कायम गोरगरीब नागरीकांना मदत केली त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या,तसेच नेवासा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.त्यांना हा पुरस्कार राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री संजयजी बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,मा.मंत्री मंगल प्रभात लोढा,मा.मंत्री.लक्ष्मण ढोबळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमित भांगे,उपसचिव सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.अहमदनगर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे यांनी आज श्री.विजय जगताप, सौ.अरुणा जगताप यांचा सपत्नीक समाज कल्याण आयुक्त कार्यालयात सत्कार केला.सत्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विजय जगताप यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला व येथून पुढेही जनतेची सेवा करणार असल्याचे सांगितले.