अहील्यानगर प्रतिनिधी:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार हे शापित असल्याचे सरकारमधील मंत्रीच सांगत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.यासंदर्भात मंगळवारी खा.नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,हे माझे मत नाही तर महायुती सरकारमधील एका बडया मंत्र्याचे आहे. दरम्यान,खा.लंके यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे हा बडा मंत्री कोण याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
खासदार नीलेश लंके यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार शापित असल्याचे सरकारमधील एका मोठ्या मंत्र्याचे मत आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदांवरून शिवसेनेत नाराजी निर्माण झाली,ज्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आणि त्यांच्या गावी गेले. यानंतर पालकमंत्री नियुक्ती थांबवण्यात आली.महायुती सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर प्रदीर्घ कालखंडानंतर गेल्या शनिवारी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. विशेषतःनाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपाचे नेते गिरीष महाजन यांच्याकडे तर रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदीती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आली.
या दोन्ही जिल्हयातील पालकमंत्री पदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला हवी होती. नाशिकमध्ये दादा भुसे तर रायगडला भरतशेठ गोगावले यांनी या पदांवर हक्क सांगितला होता.नाशिक तसेच रायगडचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे संतापून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी निघून गेले. शिंदे यांच्या संतापानंतर दोन्ही पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.या पार्श्वभुमीवर खा.नीलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली.