अहील्यानगर (दि.३१ जानेवारी):-वाडिया पार्क येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात उभारण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे फलक अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री फाडले.
हा प्रकार मुकुंदनगरच्या प्रवेशद्वारासमोरील महापालिका इमारतीच्या समोर घडला असून,या घटनेनंतर सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेच्या निमित्ताने शहरभर मान्यवरांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले होते. मात्र,काही समाजकंटकांनी या फलकांवर थुंकी टाकून आणि त्यांची तोडफोड करून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला.संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पोलिस प्रशासनाकडून याप्रकरणी तपास सुरू असून,परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.