अहिल्यानगर (दि.२ फेब्रुवारी):-स्व.बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी,वाडिया पार्क येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धेत माती विभागात महेंद्र गायकवाड आणि साकेत यादव तर गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांनी आपला झंझावात कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
त्यामुळे आज ता.२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.वा. होणाऱ्या अत्यंत चुरशीच्या अंतिम स्पर्धेत कोण विजेता होणार याची उत्सुकता संपुर्ण कुस्ती जगताला झाली आहे.दिवसभरातील सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ६५, ७४, ९२, ७०, ९७ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले.तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल झाले आहेत.तरी आज होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामना पाहण्यासाठी सर्वांनी आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष आ.संग्राम जगताप यांनी केले आहे.