अहिल्यानगर (दि.24 फेब्रुवारी):-“मानसिक आजारी व्यक्तींच्या उपचार आणि पुनर्वसनात त्याच्या कुटुंबाची भूमिका मध्यवर्ती महत्त्वाची असते.मनोरुग्णाचे आणि त्यांच्या परिवाराचे मनोबल टिकवण्यासाठी त्यांचे सातत्यपूर्ण कार्यरत आधारगट दीपस्तंभची भूमिका बजावतात, ” असे प्रतिपादन पुण्यातील एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेचे संस्थापक प्रा.अनिल वर्तक यांनी येथे केले.
अहिल्यानगर मध्ये स्नेहालय संस्थेचा मानसग्राम प्रकल्प आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने मानसिक आजारी व्यक्तींसाठी सामाजिक प्रबोधन, समुपदेशन आणि प्रशिक्षण हे उपक्रम सातत्याने राबविण्याचा मनोदय श्री.वर्तक यांनी वक्त केला.अहिल्यानगर मधील मानसिक आजारी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक नि:शुल्क कार्यशाळा आज आयोजिण्यात आली होती.या कार्यशाळेला उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला.गेली 27 वर्षे मानसिक आरोग्यासाठी कार्यरत एकलव्य संस्था, येथील मानसोपचार तज्ञ डॉ. नीरज करंदीकर आणि डॉ. अशोक कराळे, क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट दीप्ती करंदीकर आणि मानसग्राम प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मानसिक आजाराविषयी शास्त्रीय माहिती देऊन जागृती करणे या आजाराबद्दलचे समाजातील गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करणे आणि मानसिक आजारी रुग्ण व त्यांच्या पालकांसाठी स्वमदत गट उभा करणे, अशा तीन प्रमुख उद्दिष्टांसाठी कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते.श्री.वर्तक म्हणाले की, आपल्या कुटुंबातील मानसिक आजारी व्यक्तिच्या आजाराचे स्वरूप समजावून घेऊन त्याच्या नियमित उपचारांसाठी कुटुंबाचा पाठपुरावा आवश्यक असतो.
रुग्णाच्या संवादाला अथवा कृतींना प्रतिक्रिया न देता सकारात्मक प्रतिसाद कसा द्यायचा याची प्रशिक्षण नातेवाईकांना घ्यावे. तरच रुग्णाला सक्षम आणि स्वयंपूर्ण करता येते.डॉ.करंदीकर आणि डॉ.कराळे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाच्या आजार आणि व्यवस्थापनाबद्दल आणि औषधोपचारांचे बदलते स्वरूप आणि उपयोगिता यावर उपयुक्त माहिती दिली.सौ.करंदीकर यांनी रुग्णांना आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करणे, त्यांची विवाहजुळणी आणि घरातील नातेसंबंध सुधारण्याचे तंत्र आणि मंत्र यांवर संवाद केला.एकलव्य संस्थेचे (डॉ. अनिल वर्तक, प्राची मॅडम,स्मिता गोडसे ,आनंद गोडसे ,मंजिरी चव्हाण) मानसग्राम प्रकल्पाचे समन्वयक रमाकांत दोड्डी, संचालक प्रवीण मुत्याल, वृषाली गोखले, सोनाली साळवे, वेणू आंग्रे, भारत तिडके, प्रेमलता खंदारे, वैभव दळवी, सोनू शहा,अक्षय सदगुरे यांनी आयोजनात महत्त्वाचे योगदान दिले.
परिवारात मानसिक आजारी व्यक्ती असणाऱ्यांना नि:शुल्क मदत मार्गदर्शन देणाऱ्या आधार गटात सहभागी होण्यासाठी 7875273928/ 9011011006 येथे संपर्काचे आवाहन मानसग्राम प्रकल्पाने केले आहे.
आपला विश्वासू,रमाकांत दोड्डी-7875273928