संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-हिवरगाव पावसा येथील शिवा लगत मोदळवाडी,शिरापूर या तीन गावांच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या कुशीतील डोंगर आगीने पेटला आहे.सदरच्या डोंगराला मोधळवाडी गावाच्या बाजूने सायंकाळी सहा वाजता आग लागली.डोंगर अतिशय तीव्र उताराचा उंच आणि झाडीझुडपे असलेला आणि घनदाट उंच वाढलेले गवत यामुळे आगीने उग्र रूप धारण केले होते.वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे वणवा मोठ्या प्रमाणात जंगल व्यापत चालला होता.
आग विझवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आली नाही.पहाटे पाच वाजेपर्यंत आग धूमसत होती यामध्ये मोठी वनसंपदा,झाडे झुडपे,पशुपक्षी नष्ट झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.परंतु सदरच्या नुकसानी बाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही.साधारण हजारो मीटर उंची असलेल्या कडे कपारीमधून अंधारात डोंगरावर जाऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही आग विझवीत असताना डोंगराला तीव्र उतार असल्याने अडचणी येत होत्या.ही आग विझविण्यासाठी वनविभाग कर्मचारी,स्थानिक नागरिक यांनी सोमवारी रात्री आठपासून बुधवारी पहाटे तीन वाजे पर्यंत अथक प्रयत्न केले.उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाळलेली झाडीझुडपे व गवत आणि वाऱ्याचा वेग यामुळे वणव्याने खूपच उग्र रूप धारण केले होते.रेंज फॉरेस्ट ऑफिसर संगमनेर भाग 1 चे एस एम लोंढे,रेंज फॉरेस्ट ऑफिसर संगमनेर भाग दोनचे सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक राकेश कोळी,श्री.यादव व इतर वनमजूर असे दहा ते पंधरा कर्मचारी यांनी फायर ब्लेअर मशीन ने आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.या वणव्यात जंगल क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.
हिवरगाव पावसा,मोधळवाडी,शिरपूर हद्दीतील मोठ्या क्षेत्रावरील जंगलातील विविध झाडीझुडपे,वनस्पती,विविध जंगली प्राणी यांचे मोठे नुकसान झाले आहे.सदरचा डोंगर जळून काळवंडला आहे.त्यामुळे वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य करणारे वृक्षमित्र गणपत पावसे, सरपंच सुभाष गडाख,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव पावसे,वन विभागाचे अण्णासाहेब गिरी,महसूल सहाय्यक चंद्रकांत भालेराव, यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ व परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.काही दिवसांपासून डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे.जवळे बाळेश्वर,सावरगाव घुले, हिवरगाव पावसा या डोंगरांना आग लागल्याने मोठे निसर्ग संपत्तीचे नुकसान झाले आहे.जंगलाला जी आग लागते, तिचं कारण नैसर्गिक नाही तर ही संपूर्ण आग माणसांकडूनच लावली जाते.ही आग लावण्याची विविध कारणं असू शकतात, मात्र वन विभागाच्या वतीनं जंगलाला आग लावू नये, यासाठी सातत्यानं जनजागृती केली पाहिजे.जंगलाला आग लागण्याचे दुष्परिणाम याबाबत गावागावात जागृती करणे आवश्यक आहे.शाळांमधून सांस्कृतिक कार्यक्रमातून माहिती दिली पाहिजे,वन क्षेत्रात वणवा पेटल्यास,आग पुढे पसरू नये यासाठी जाळ रेषा काढण्याची उपाय योजना वन विभागाने राबवणे आवश्यक आहे.जाळ रेषा घेण्याचे काम रोहयोंतर्गत घेतल्यास मोठ्या प्रमाणात जाळ रेषेचे काम शक्य होईल, अशावेळी टेहळणीसाठी प्रत्येक रेंजकडे ड्रोनची गरज आहे. ठराविक ठिकाणी सी सी टीव्ही बसवावेत.स्थानिक तरुणांना आग नियंत्रणाचे प्रशिक्षण दिल्यास तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होईल.त्यामुळे आग विझवण्यासाठी मोठे सहकार्य मिळेल.अशा प्रकारे उपाय योजना वन विभागाने राबविल्यस आग नियंत्रण मिळून अनमोल वनसंपदेचे संवर्धन करणे शक्य होईल.