आठवीतील विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून शहरात एकच खळबळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथील सीताराम सारडा विद्यालयात दहावीतील विद्यार्थ्यांचा आठवीतील विद्यार्थ्याने चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे.खून करणारा व खून झालेला असे दोघेही विद्यार्थी रामवाडीतील रहिवासी असून त्यांच्यातील वैयक्तिक भांडण वाढून शाळेमध्ये त्याने या विद्यार्थ्यांला संपविले. दरम्यान,शाळेच्या वेळेत घडलेल्या या धक्कादायक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

अफान तनवीर शेख (वय १६ वर्ष, रा. रामवाडी झोपडपट्टी) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो दहावीच्या वर्गात शिकत आहे.खून करणारा विद्यार्थी १४ वर्षांचा असून तो आठवीच्या वर्गात शिकतो.दोघेही रामवाडी परिसरात राहण्यास आहेत. या दोघांचे वैयक्तिक कारणातून झालेले भांडण शाळेत जास्तच वाढले व त्यातूनच आज दुपारी साडेतीनच्या सुमारास आठवीतील विद्याथ्यांनी अफान शेख याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला. गंभीर जखमी अवस्थेत अफान याला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.