अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव..खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सध्या नगर शहरातील पोलिस प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला. यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावट पसरले असून, नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत असल्याचे लंके यांनी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. किरण काळे यांच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी एका खोट्या बलात्कार गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. आता या मालिकेत आणखी एक प्रकरण जोडले गेले असून, माजीमंत्री व शिवसेना उपनेते दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांच्यावरही कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरले असून, फिर्यादी व्यक्तीचा संबंध राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी असल्याचे खा. लंके यांचे म्हणणे आहे.या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ घालणाऱ्या फिर्यादी व्यक्तीच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिस त्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते.खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला तीव्र संताप या पार्श्वभूमीवर, अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांनी पोलिस प्रशासनाच्या पक्षपाती आणि निवडक कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गृह विभागाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदवले जात आहेत, तर प्रत्यक्ष गोंधळ घालणाऱ्यांना अभय दिले जात आहे. ही बाब केवळ अन्यायकारक नसून, लोकशाही मूल्यांवर आघात करणारी आहे.नगर शहरात घडणाऱ्या या घटनांमुळे पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याचे जे कर्तव्य पोलीस दलावर आहे, त्याच संस्थेवर राजकीय दबावाखाली अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत असल्याचे आरोप सार्वजनिकरित्या होत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे.खासदार लंके यांनी दोन्ही प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संपूर्ण तपशीलासह अहवाल गृह विभागास सादर करण्यात यावा, खोटे गुन्हे नोंदवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्यात यावी.
भविष्यात कोणताही राजकीय दबाव न स्वीकारता, सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे काम करावे, यासाठी स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.”पोलिस दल जर अन्यायकारक आणि पक्षीय भूमिका घेऊ लागले, तर नागरिकांच्या सुरक्षेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनतो,” असे विधान करत खासदार लंके यांनी शासनाकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.