अहमदनगर प्रतिनिधी(दि.४ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील बेलापूर परिसरात असलेल्या बालाजी स्टोन क्रेशर येथील विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारेची अज्ञाताने चोरी केली आहे. सुमारे एक लाख 30 हजार रुपयांची 480 किलो तार चोरट्याने चोरून नेली असून या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विकास नारायण आंधळे (रा.आळेफाटा,ता.जुन्नर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.फिर्यादी विकास आंधळे यांच्या मालकीचे बेलापूर परिसरात बालाजी नावाने स्टोन क्रेशर आहे.सहा महिन्यांपूर्वी राज्यात अस्तित्वात आलेल्या सरकारने राज्यभरातील बहुतांश स्टोन क्रेशर नियमांचा भंग केल्याच्या नावाखाली बंद केली आहेत.प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच क्रेशर बंद आहेत.बंद असलेल्या क्रेशरच्या ठिकाणी चोरी होण्याच्या घटना गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.दि.१ मार्च रोजी मध्यरात्री बालाजी स्टोन क्रेशरवरील वीज अचानक गायब झाली.तेथील कामगारांनी सकाळी उठल्यानंतर वीज नसल्याने वीज रोहित्राकडे जाऊन पाहणी केली असता रोहित्र खाली उतरवून त्यातील ऑईल सोडून देत त्यातील 480 किलो तांब्याची तार चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी क्रेशरचे मालक विकास आंधळे यांना माहिती दिली असता त्यांनी पाहणी करत अकोले पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेत फिर्यादी आंधळे यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोकाॅ/ टपले करत आहेत.सरकारच्या नव्या धोरणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून स्टोन क्रेशर बंद आहेत.यामुळे स्टोन क्रेशर व्यवसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत.व्यवसाय बंद असल्याने भेडसावत असलेल्या आर्थिक अडचणी,व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते व्यवसाय बंद असल्याने थकणे आणि त्यात चोरी होऊन आणखी नुकसान होणे यामुळे व्यावसायिकांत मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे.शासनाने गौण खनिजाबाबतची धोरणे लवकरात लवकर जाहीर करून क्रेशर मालकांना क्रेशर सुरू करण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या खनिकर्म विभागातील कर्मचाऱ्यांकडून क्रेशर मालकांना एकेरी भाषेचा वापर करून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी देखील व्यावसायिकांकडून होत आहे.
