अहिल्यानगर..ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी अखेर त्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात करजगाव येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांच्या आत्महत्या प्रकरणी कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बाजीराव बाचकर यांनी 8 ऑगस्ट 2025 रोजी विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले होते.त्यांच्या आत्महत्येमागे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने होणारा मानसिक आणि आर्थिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप बाचकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी बाचकर कुटुंबीय,नातेवाईक, धनगर समाजाचे नेते आणि करजगाव ग्रामस्थांनी सोनई पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.सुमारे नऊ दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संदीप दळवी आणि बबन वाघमोडे यांच्याविरुद्ध आर्थिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.