आधार केंद्रांवर नागरिकांची अफाट गर्दी..!नागरिकांचा उद्रेक, अपडेटसाठी महिलां-विद्यार्थ्यांची सकाळपासून धावपळ..अधिक आधार केंद्रे सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहर आणि परिसरातील आधार केंद्रांवर नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून,महिलां व विद्यार्थ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.आधारकार्ड अपडेट, मोबाईल नंबर लिंक,बोटांचे ठसे व फोटो रेकॉर्डिंग करण्यासाठी आधार केंद्रांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.१ ते ५ वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी त्यांच्या पालकांना दिवसभर लहान मुलांना घेऊन आधार केंद्रावर उभे राहावे लागत आहे.
प्रत्येक केंद्रावर दिवसभरात केवळ २५ ते ५० नागरिकांचेच अर्ज स्वीकारले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.सकाळपासून उभे असतानाही काम न झाल्याने महिला,वृद्ध,विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षांचे वेळापत्रक सुरू असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे अधिक आधार केंद्रे सुरू करून कार्यक्षम व्यवस्था करावी,अशी मागणी केली आहे.दरम्यान,शनिवार व रविवारी अनेक केंद्रे बंद राहिल्याने गर्दी आणखीनच वाढली आहे. नागरिकांनी “आधार केंद्रांवरील रांग संपणार कधी?” असा सवाल उपस्थित केला आहे.
