युरिया मिश्रित चाऱ्यामुळे १३ शेळ्यांचा मृत्यू…तालुक्यातील अरणगाव शिवारात निर्दय कृत्य.. शेळीपालक महिलेचे मोठे आर्थिक नुकसान
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील मेहेरबाबा ट्रस्ट फॉरेस्ट परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, शेळ्यांना युरिया मिश्रित चारा खाऊ घातल्यामुळे तब्बल १३ शेळ्या आणि एक पिलू ठार झाले आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, पीडित शेळीपालक महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सोनेवाडी (चास) येथील ३४ वर्षीय शेळीपालक महिलेच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलिसांनी तुकाराम सदाशिव नाट,साक्षी तुकाराम नाट, सुनिता तुकाराम नाट आणि दत्ता साहेबराव नाट या एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही हृदयद्रावक घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.
आरोपींनी पीडित महिलेच्या शेळ्यांना अरणगाव शिवारातील नवीन बायपास रोडलगत बेकायदेशीररित्या कोंडून ठेवले.त्यानंतर युरियामिश्रित चारा खाऊ घातल्याने शेळ्या जागीच कोसळल्या.यात ६० हजार रुपयांच्या चार शेळ्या आणि १२ हजार रुपयांच्या तीन पिलांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तेरा शेळ्या व एक पिलू मरणासन्न अवस्थेत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या शेळ्यांची किंमत तब्बल १ लाख ९५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.पीडित महिलेने १२ नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील ग्रामस्थांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात करत आहेत.या अमानुष प्रकारामुळे अरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून,शेळीपालन व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
