युद्धसदृश परिस्थितीत धावून आले मा.खासदार डॉ.सुजय विखे..बहरीनमध्ये अडकलेले जठार कुटुंब परतले सुखरूप मायदेशी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आखाती देशात अडकलेल्या एका कुटुंबाला सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेचे जिल्हाभर कौतुक होत आहे. त्यांच्या संवेदनशील व मानवी दृष्टिकोनामुळे एका कुटुंबाला दिलासा मिळाला असून राजकारणापलीकडचा माणूस अशी त्यांची ओळख अधिक ठळक झाली आहे.मूळचे अहिल्यानगर येथील सत्यजित जठार व त्यांचे कुटुंब बहरीनमध्ये अडकले होते. २८ फेब्रुवारी रोजी इराणकडून हल्ले सुरू झाल्यानंतर बहरीन देशाची एअरस्पेस बंद करण्यात आली. याच दरम्यान जठार कुटुंबातील मुलगा साहस जठार याचा पासपोर्ट नूतनीकरण झाला नसल्याने अडथळा आला होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला बहरीनमध्येच थांबावे लागले व त्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली.या अडचणीबाबत जठार कुटुंबाने नगरसेवक धनंजय जाधव यांच्याशी संपर्क साधला. धनंजय जाधव यांनी तात्काळ डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. विखे यांनी त्वरित दिल्लीतील यंत्रणा कामाला लावली आणि संबंधित पासपोर्ट बहरीनपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली.पासपोर्ट मिळाल्यानंतर जठार कुटुंब सुखरूप मायदेशी परतले आणि पुढे अहिल्यानगर येथे पोहोचले.
या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी घरच्या व्यक्तीप्रमाणे काळजी घेत मदत केल्याने जठार कुटुंबाने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.दरम्यान, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तणावाचे वातावरण असून अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद, सुरक्षा अलर्ट व प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क आहे. अशा कठीण परिस्थितीत वेळेत समन्वय साधून जठार कुटुंबाला मायदेशी आणण्यात यश आल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तत्परतेचे विशेष कौतुक होत आहे.
